देशातील सर्वात मोठे राज्य म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख आवर्जून केला जातो. महाराष्ट्राला सुंदर समुद्रकिनारा, किल्ले, लेण्या, मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे इत्यादी अनेक गोष्टी लाभल्या आहेत. त्यामुळेच, देश-विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने महाराष्ट्राला भेट देण्यासाठी येतात.
आता उन्हाळा सुरू आहे. लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या ही लागल्या आहेत. त्यामुळे, हा वातावरणातील उकाडा दूर करण्यासाठी अनेक जण कुटुंबासोबत फिरायला जाण्याचे नियोजन करतात.
यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही देखील कुटुंबासोबत फिरायला जाण्याचे नियोजन करत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांबद्दल सांगणार आहोत.
मालवण :
कोकणातील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा म्हणून मालवणची खास ओळख आहे. तळकोकणातील हे सुंदर ठिकाण पर्यटकांच्या आवडीचे आहे. नितळ आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात तर या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. येथील किनाऱ्यावरील पांढरी वाळू आणि निळे पाणी पर्यटकांना आकर्षित करते. या समुद्रकिनाऱ्यावर असलेली नारळाची आणि काजूची झाडे सौंदर्यात आणखी भर घालतात. येथे आल्यावर तुम्ही वॉटरस्पोर्ट्सचा ही आनंद घेऊ शकता. वॉटरस्पोर्ट्सोबतच तुम्ही स्कूबा डायव्हिंग देखील करू शकता.
आंजर्ले :
शांत आणि सुंदर समुद्रकिनारा म्हणून आंजर्ले बीच प्रसिद्ध आहे. या समुद्रकिनाऱ्याचे निळ्या रंगाचे पाणी आणि आजूबाजूला असलेली नारळाची, पोफळीची झाडे येथील सौंदर्यात आणखी भर घालतात. या बीचवर अनेक जण कुटुंबासोबत शॉर्ट पिकनीकसाठी येतात. सर्वात स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असलेला हा बीच पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. येथे आल्यावर विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा तुम्ही आनंद घेऊ शकता आणि बीचवर निवांत वेळ घालवू शकता.
तारकर्ली
सिंधूदुर्ग जिल्ह्यातील हे अतिशय लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. मालवणपासून हा समुद्रकिनारा अवघ्या ८ किलोमीटरवर आहे. हा स्वच्छ समुद्रकिनारा स्कूबा डायव्हिंगसाठी खास करून लोकप्रिय आहे. स्कूबा डायव्हिंगसोबतच तुम्ही विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचा ही आनंद या ठिकाणी घेऊ शकता.
थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले..! महाराष्ट्रातल्या ‘या’ समुद्रकिनाऱ्यांची बातच न्यारी, कुटुंबासोबत नक्की भेट द्या